’ऑपरेशन सिंदूर’ शौर्याचे प्रतीक   

निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांचे प्रतिपादन 

पुणे : पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर  ’ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारतीय सैन्यांने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून उद्ववस्त केले. तसेच, शंभरहून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे ’ऑपरेशन सिंदूर’ हे भारतीय सैन्यदलांच्या शौर्याचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांनी केले. 
 
केशव माधव न्यासतर्फे ’ऑपरेशन सिंदूर’चे विविध पैलू उलगडून दाखविणार्‍या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी (ता.२४) पटवर्धन बाग सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जगातील पहिले टॅक्टिकल युद्ध आपण जिंकले. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांचा योग्य वापर, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. आपल्या भारतीय सैन्याचे विराट शौर्य सार्‍या जगाला दाखवून दिले.
 
भारताने स्वदेशी शस्त्रांनी दाखविलेली प्रभावी कामगिरी ही या धोरणाची यशोगाथा आहे. ऑपरेशन सिंदुर हे शीर्षक देखील योग्य ठरवले गेले. या मोहिमेत भारताने अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि स्वदेशी बनावटीची संरक्षकप्रणाली यांचा प्रभावी वापर केला. पाकिस्तानने वापरलेली चिनी व तुर्की बनावटीची यंत्रणा भारतीय तंत्रज्ञानापुढे टिकू शकली नाही. भारताच्या डी ४००, आकाश, आकाशतीर आणि ब्रह्मोस या प्रणालींनी सर्व हल्ले अडवले. आकाशतीर ही भारतात बनलेली अत्याधुनिक स्वयंचलित सुरक्षाप्रणाली असून ती यावेळी विशेष चर्चिली गेली आहे. या तंत्रज्ञानामुळे शत्रूंचे हल्ले थोपविण्यात यश आले. त्यामुळे जगाला भारतीय सैन्यदलांच्या शौर्याचे दर्शन घडवले गेले.
 
निवृत्त विंग कमांडर अविनाश मुठाळ यांनी ऑपरेशन सिंदुरची माहिती प्रभावी शैलीत उलगडून दाखवली. तसेच, अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. मुठाळ म्हणाले, ऑपरेशन सिंदुर जागतिक सर्वोत्तम युद्धांपैकी एक असून आत्मनिर्भर भारतअंतर्गत शस्त्रांची मारक क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. भारतानेऑपरेशन सिंदुरमार्फत ’सायकॉलॉजिकल व इन्फॉर्मेशन वॉर फेअर’चे उत्तम दर्शन घडवले. कर्नल सेफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी युद्धाची अद्ययावत माहिती देऊन पाकिस्तानवर दबाव आणला. त्यांचा अजेंडा हाणून पडला. आपली इंटिग्रेटेड डिफेन्स सिस्टीम एकदम मजबूत असल्याने त्यांनी केलेले सर्व हल्ले परतावून लावले. त्यामुळे जागतिक संरक्षण बाजारपेठेमध्ये आपल्या शस्त्रांची मागणी वाढलेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केशव माधव न्यासचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी भूषविले. भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा व्याख्यान आयोजनाचा मुख्य उद्देश होता. या व्याख्यानास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगरचे संघचालक उदयन पाठक, अविनाश वजल, डॉ सुनील पुणतांबेकर, बाळकृष्ण काळे, डॉ. सतीश जोशी यांच्यासह राज्यातील अनेक पूर्व सैन्याधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी केशव माधव न्यासचे सचिव अरविंद देशपांडे यांनी संस्थेच्या केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. अध्यक्ष सदानंद भागवत, एअर मार्शल प्रदीप बापट व अरविंद देशपांडे यांचे हस्ते विंग कमांडर अविनाश मुठाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन केशव माधवचे विश्वस्त योगेश कुलकर्णी यांनी केले. तर प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.
 

Related Articles